मुंबई: विधानसभा निवडणूक तोंडावर असून धनगर समाजाला खुश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जातीला लागू असलेल्या 22 योजना धनगर समाजाला लागू करण्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे एसटी प्रवर्गाला असलेल्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू होणार आहेत.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलती द्याव्यात, या मागणीसाठी समाजबांधवांनी शासनाकडे अनेकवेळा विनंती केली होती. धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको, डोकेफोड, मुंडण आंदोलनेही केली. परंतु आरक्षणाबाबत शासनाने अद्याप कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे राज्यातील धनगर समाजबांधव आक्रमक झालेले होते. त्यामुळे शासनानं आज अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलती धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर करण्याचे आश्वासन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. बारामतीमध्ये मोर्चा काढला तेव्हा ‘आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच मीटिंगमध्ये आरक्षणाचा प्रश्न निकाली काढतो,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, त्यांनी ते पाळले नाही. धनगर समाजाच्या जीवावर जशी सत्ता मिळविता येते, हे राज्यकर्त्यांना माहीत आहे; पण तशाच पद्धतीने आम्ही ती ओढून घ्यायला कमी पडणार नाही, असा इशारा धनगर समाजाच्या बांधवांकडून देण्यात आला होता.