मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष जवळपास मिटण्यात जमा आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस तिन्ही पक्ष मिळून सरकार बनणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. याबाबत आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले असून आज याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे. आज तिन्ही पक्षांची चर्चा होणार असून त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेची दावा केला जाणार असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे अशी आमची देखील इच्छा आहे, मोठे पद असल्याने ते मुख्यमंत्री व्हावे. शेवटी त्यांचा पक्ष जो ठरवेल तो मुख्यमंत्री होईल असेही माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने कधीही मुख्यमंत्री पदाची मागणी केलेली नाही असे सांगून त्यांनी पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील असे संकेत देखील दिले आहे. थोड्याच वेळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाची एकत्रित बैठक होणार आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.