CAA, स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी लढाई: जितेंद्र आव्हाड

0

मुंबई: देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलन सुरु झाली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका करत, कायदा मागे घेण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. नागरिकत्व कायद्याची लढाई ही देशातील स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी लढाई असल्याचे म्हटले आहे.

मुस्लिमांचे नाव समोर करुन हिंदूंना गाफील ठेवण्याची ही नीती आहे. आसाम राज्यात १४ लाख हिंदू बांधवांकडे कागदपत्रे नाहीत. महाराष्ट्रातही ऊसतोड कामगार, पारधी समाज, असे अनेक समाज आहेत ज्यांच्याकडे पूर्वजांची कागदपत्रे सापडणार नाहीत. त्यामुळे नागरिकत्व कायद्याचा फटका त्यांना सुद्धा बसणार असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. मोदींच्या रुपाने ‘हिटलर’ चा पुनर्जन्म झाला आहे असे म्हटले आहे.

लवकरच सोशल मीडियासाठी कायदा आणणार आहेत. तेव्हा तुम्ही काढलेले फोटो किंवा तुम्ही कोणासोबत संभाषण केले, हे सुद्धा मोदी यांना कळणार आहे. त्यांना दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची सवय असल्याचा खोचक टोला आव्हाड यांनी मोदींना लगावला. हा लढा हिंदू-मुस्लीम नव्हे तर हेगडेवार,गोळवलकर यांच्या विचारांच्या विरोधातील असल्याचे सुद्धा आव्हाड म्हणाले.