श्रीहरीकोटा: संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या भारताच्या महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२चे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले आहे. ‘इस्रो’या संदर्भातली घोषणा केलेली आहे. सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनीटांनी भारताचे हे यान अवकाशात झेपावणार होते. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होते. मात्र ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द निर्णय घेण्यात आलेला आहे. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच जाहीर करणार आहे.
प्रक्षेपण झाल्यानंतर ५२ दिवसांनी ‘चांद्रयान-२’ चंद्रावर पोहोचणार होते. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरणार आहे. चंद्रावरच्या खनिजांचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान-२ मोहीम आखण्यात आली आहे. चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही, अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ संशोधन करणार आहे.