भुजबळ सेनेत असते तर सडण्याची वेळ आली नसती

0

सामनातून छगन भुजबळांवर केली टीका

मुंबई:- भुजबळ शिवसेनेत असते तर त्यांच्यावर अशाप्रकारे तुरुंगात सडण्याची वेळ आली नसती. संकटकाळात जिवास जीव देणारे लोक हीच शिवसेनेची श्रीमंती आहे असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून लगावला आहे. भुजबळांची अटक व तुरुंगवास हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड ठरावा असे या लेखात म्हटले आहे.

भुजबळ हे राज्याचे गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी त्यांनी जो आटापिटा केला होता त्याचे विस्मरण महाराष्ट्राला झालेले नाही. ‘सामना’तील जुन्या अग्रलेखांचे प्रकरण त्यांनी उकरून काढले व शिवसेनाप्रमुखांना अटक करणारच असा विडा त्यांनी उचलला. पण हे सर्व प्रकरण न्यायालयाने पाच मिनिटांत उडवून लावले. दिल्लीत तेव्हा आमच्या प्रिय मित्रपक्षाचे राज्य होते व शिवसेनाप्रमुखांच्या अटकेनंतर उसळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेव्हाच्या दिल्लीवाल्यांनी इतर राज्यांची पोलीस कुमक महाराष्ट्रात पाठवली होती. म्हणजे शिवसेनेच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची ‘गुप्त’ युती ही तेव्हापासून आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. अर्थात हे अटकमटक प्रकरण सरकारवरच उलटले. योगायोग असा की, आज तुरुंगवास भोगणारे भुजबळ ज्या वयाचे आहेत त्यावेळी बाळासाहेबही त्याच वयाचे होते हे इथे खास नमूद करीत आहोत असेही त्यांनी सांगितले.

हिंदुत्वाचा प्रचार करणारे अग्रलेख लिहिले, भाषणे केली म्हणून तो खटला बाळासाहेबांवर चालवला गेला. त्यांच्यावर आर्थिक गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे नव्हते. पण आज भुजबळांच्या सुटकेच्या निमित्ताने आम्हाला हे सर्व आठवत आहे. भुजबळांनी शिवसेना का सोडली हा त्यांचा प्रश्न, पण शिवसेना सोडल्यावर त्यांनी शिवसेनेच्या विरोधात जे केले त्यामुळे ते सगळ्य़ांच्याच मनातून उतरले. भुजबळ शिवसेनेत असते तर त्यांच्यावर अशाप्रकारे तुरुंगात सडण्याची वेळ आली नसती. संकटकाळात जिवास जीव देणारे लोक हीच शिवसेनेची श्रीमंती आहे असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. भुजबळ भायखळ्याच्या रस्त्यांवर भाजी विकत असत. त्या रस्त्यावरून शिवसेनेने त्यांना मुंबईच्या महापौर निवासात व विधिमंडळात पोहोचवले, पण त्याच विधिमंडळातून ते तुरुंगात पोहोचले. भुजबळांच्या सुटकेने आनंद झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व्यक्त केली, पण हा आनंद खरा आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मुख्य म्हणजे भुजबळ हे मनाने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिले आहेत काय या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळणार नाहीत असेही ते बोलले आहेत. भुजबळांवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. राजधानी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील कथित घोटाळा तसेच अन्य कंत्रांटांच्या बदल्यात काळ्य़ा पैशांची कमाई केल्याचा आरोप आहेच. शिवाय मनी लॉण्डरिंगसारखे गुन्हेही सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्यावर नोंदवले आहेत. अशा प्रकारच्या खटल्यांतील नियम व कायदे अत्यंत जाचक आहेत. तरीही चिदंबरम यांचे पुत्र कार्ती हे अशाच मनी लॉण्डरिंग प्रकरणात तुरुंगात गेले व आठेक दिवसांत जामिनावर बाहेर आले, पण भुजबळ दोन वर्षे तुरुंगात सडत राहिले. कायद्याचा व सत्तेचा वापर राजकीय सूड घेण्यासाठी सर्रास केला जातो अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.