नाशिक: राज्यातील विधानसभा निवडणुकीला काही महिने अवधी असतांना शिवसेना, भाजपा मध्ये मुख्यमंत्री पदावरून आतापासूनच वाद सुरु असल्याचे चीत्र पाहण्यात मिळत आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे सांगितले होते. आता भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी कुणी काहीही सांगो राज्यात मुख्यमंत्री भाजपाचा होणार असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.
देशात भाजप हा अत्यंत मजबूत पक्ष असून लोक भाजपात यायला इच्छुक आहे असे त्या म्हणाल्या. नाशिक जिल्हा आढावा बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
या अगोदर जून महिन्यातील मुंबईतील आढावा बैठकीतही पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचा होणार असे वक्तव्य केले होते. पांडे यांच्या वक्तव्याबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असे स्पष्ट केले होते. मात्र, राज्याच्या प्रभारी असलेल्या पांडे यांनी पुन्हा एकदा वक्तव्य करत भाजपची भूमिका स्पष्टकरत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
लोकशाही शासन व्यवस्थेत विरोधी पक्ष मजबूत असावा लागतो. मात्र, देशात आणि राज्यात विरोधी पक्ष निष्प्रक्ष असल्याची टीका त्यांनी केली आहे. कर्नाटक मधील परिस्थितीवरून काँग्रेसला भाजपवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसला आपले लोक सांभाळण्यात अपयश आल्याचे त्या म्हणाल्या. भाजप कधीही ‘डर्टी पॉलिटिक्स’ करत नसल्याचा दावा त्यांनी केला.