प्रत्येक पाऊलावर सावध रहा, सावध रहा, सावध रहा; मुख्यमंत्र्यांची साद

0

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी २० रोजी राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना संपलेला नाही असे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक पाऊलावर सावध राहावे अशी साद घातली आहे. करोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असली तरीही धोका अजून टळलेला नाही असे सांगत नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. लॉकडाऊनची आवश्यकता भासेल असे वागू नका असेही त्यांनी सांगितले.

करोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न, नागरिकांनी घ्यायची काळजी, राज्यातील विकासकामे, कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा मुद्दा अशा विविधी गोष्टींवर राज्य सरकारची भूमिका मांडत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोलेही लगावले. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादनही उद्धव ठाकरेंनी केले.

दरम्यान राज्यात पुन्हा लॉकडाउन आणि नाईट कर्फ्यू लावण्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी महत्वाची माहिती दिली. “अनेकांनी मला सांगितलं की ज्या चाचण्या करताय त्या आता कमी करा. जे सुरूवातीच्या काळात झालं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चाचण्या करतोय. बाहेरून येणाऱ्या लोकांना जर संसर्ग झाला असेल तर त्यांच्यामुळे आपल्याला पुन्हा राज्यात संसर्ग वाढू द्यायचा नाहीये. पुन्हा लॉकडाउन नाईट कर्फ्यू करण्याची गरज नाही असं मला वाटतं. आपण अनुभवातून शिकलोय,” असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.