कॉंग्रेसकडून ६ वेळा ‘सर्जिकल स्ट्राइक’ केल्याचा दावा; मात्र भाजपने दावा फेटाळला !

0

नवी दिल्ली:काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात सहा वेळा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी हा दावा केलाय. काँग्रेस सरकारने ‘सर्जिकल स्ट्राइक’ कधी केले याच्या तारखाही राजीव शुक्ला यांनी दिल्या.

मात्र केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी हा दावा फेटाळला आहे. कॉंग्रेस करत असलेल्या दाव्यात तथ्य नाही. मी सैन्यात होतो, आम्हाला माहित आहे, काय व्हायचे. आज संपूर्ण देश भाजपा आणि मोदींच्या सोबत असल्याने कॉंग्रेस हा दावा करत आहे, असे मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी म्हटले आहे.

आम्ही छाती ठोकत फिरलो नाही. पंतप्रधान असताना अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ.मनमोहनसिंग यांनीही कधीच ‘सर्जिकल स्ट्राइक’चा दिंडोरा पिटला नाही. मात्र, आताचे सरकार ‘सर्जिकल स्ट्राइक’चा गाजावाजा करत फिरत आहे, असा टोला राजीव शुक्ला यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपप्रणित एनडीए सरकारला लगावला.

जम्मू-काश्मीरच्या पुंछमधील भट्टल सेक्टरमध्ये १९ जून २००८मध्ये सर्वात प्रथम ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आला. केलमध्ये नीलम नदीच्या खोऱ्यात शारदा सेक्टर येथे २०११मध्ये ३० ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला दुसरा ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला गेला. ६ जानेवारी २०१३मध्ये सावन पात्र चेकपोस्ट येथे तिसरा, नजापीर येथे २७-२८ जुलै २०१३ला चौथा, ६ ऑगस्ट २०१३ ला पाचवा आणि १४ जानेवारी २०१४ला सहावा सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता, अशी माहिती राजीव शुक्ला यांनी दिली.

काँग्रेसप्रणित यूपीए सरकारबरोबरच अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळातही दोन वेळा सर्जिकल करण्यात आले होते. नीलम नदीच्यापलिकडे असलेल्या नाडला एन्क्लेव्ह भागात २१ जानेवारी २०००ला पहिला ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आला होता. तर १८ सप्टेंबर २००३ मध्ये पुंछ जिल्ह्यातील बारोह येथे दुसरा ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला होता, असे शुक्ला म्हणाले.