भाजपला हरविण्यासाठी कॉंग्रेस करणार महाआघाडी

0

नवी दिल्ली : लोकसभेत स्पष्ट बहूमत मिळवत सत्ता मिळवलेल्या भाजपचा आगामी निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. बिहारमध्ये २०१५च्या निवडणुकीत महाआघाडी केल्याचा काँग्रेसला चांगला फायदा झाला. स्थानिक पक्षांना सोबत घेतल्याचा पक्षाला फायदा होत असल्याचे काँग्रेस नेत्रृत्वाच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच आता आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे देशभरातील विविध स्थानिक पक्षांसोबत आघाडी करत ४०० ते ४५० जागा लढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याच महिन्यात होणार चर्चा

याच महिन्यात वेगवेगळ्या स्थानिक पक्षांसोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेत्रृत्वात कमिटी बनवण्यात येत आहे. राहुल गांधी परदेशातून परतल्यानंतर यावर काम सुरु करण्यात येणार आहे. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ५ वर्षांपूर्वी जे राहुल गांधी आघाडी करण्यास उत्सुक नव्हते तेच आता आघाडी करण्यास उत्सुक झाले आहेत. काँग्रेस पक्षासोबत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय लोकदल आहे. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत काँग्रेस पक्षाचे चांगले संबंध आहेत. महाराष्ट्रातही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत चांगले संबध आहेत. तर, कर्नाटकातही जेडीएसची साथ मिळाली आहे.