नवी दिल्ली: कोरोनाचा सर्वच क्षेत्राला फटका बसत आहे. पूर्वनियोजित सर्व कार्यक्रमे रद्द होत आहे. दरम्यान आता राज्यसभा निवडणूकही स्थगित करण्यात आली आहे. २६ मार्च रोजी होणाऱ्या राज्य सभेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून अद्याप या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली नाही. राज्यसभेच्या ५५ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार होती. ३७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १८ जागांसाठी निवडणुका होणार होत्या. महाराष्ट्रातून राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, फौजिया खान, भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उदयनराजे भोंसले, भागवत कराड, शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी, कॉंग्रेसचे राजीव सातव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मात्र महाराष्ट्रातील ७ जागा बिनविरोध झाल्याने त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु काही ठिकाणी काँग्रेस आणि भाजपामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार होती. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, मणिपुर, मेघालय, आंध्र प्रदेश आणि झारखंडच्या राज्यसभेच्या जागांसाठी या निवडणुका होणार आहेत.