नवी दिल्ली: देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात दररोज ७५ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. २४ तासात धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताने जगालाही मागे टाकले आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून अमेरिकेचाही रेकॉर्ड मोडला आहे. देशात शनिवारी कोरोनाचे तब्बल ७८ हजार ७६१ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे देशातील रुग्णसंख्येने 35 लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील सात दिवसात आढलेली रुग्ण संख्या जगापेक्षा अधिक आहे. देशात गेल्या सात दिवसांमध्ये ४ लाख ९६ हजार ०७० नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे देशात आतापर्यंत ६३ हजार ४९८ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आजपर्यंत देशात ३५ लाख ४२ हजार ७३४ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सध्या देशात ७ लाख ६५ हजार ३०२ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. आतापर्यंत २७ लाख १३ हजार ९३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतातील बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. सध्या २१ टक्के रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. भारतातील मृत्यूदर १.७९ टक्क्यांवर आहे.
महाराष्ट्रातील आकडा चिंता वाढवणारा आहे. राज्यातील मृतांची संख्या 24 हजार 103 वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.15 % एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.58 टक्के एवढे झाले आहे. देशामध्ये हरियाणा, दिल्ली, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्येही रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली असून लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.