नवी दिल्ली: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा भारतातही संसर्ग वेगाने होत आहे. भारतात दरदिवसाला ८० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. चिंताजनकबाब म्हणजे देशातील करोनाबाधितांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी एका दिवसांत देशात ८६ हजार ४३२ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या २४ तासांत एक हजार ८९ जणांचा मृत्यू झाला आहे दिलासादायक बाब म्हणजे ३१ देशात आतापर्यत लाख ७ हजार २२३ जणांनी करोनावर मात केली आहे. ८ लाख ४६ हजार ३९५ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाख २३ हजार १७९ इतकी झाली आहे. आतापर्यंत देशात ६९ हजार ५६१ जणांचा मृत्यू झाला आहे.
सलग आठ दिवस दररोज ६० हजारांहून अधिक रुग्ण बरे होत आहेत. करोनामुक्त होण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे. ३.५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मृत्युदर १.७४ टक्के आहे. सलग दुसऱ्या दिवशी ११.७० लाखांहून अधिक नमुना चाचण्या करण्यात आल्या. भारतातील चाचण्यांचे प्रमाण वाढले असून पाच कोटींपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी एका दिवसांत १० लाख ५९ हजार ३४६ चाचण्या करण्यात आल्या.