नाशिक विभागाच्या ई-फेरफार प्रणालीमध्ये जळगाव राज्यात तिसरा

विभागातील पाचही जिल्हे राज्यात अव्वलस्थानी

जळगाव: महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीमध्ये प्रलंबित अनोंदणीकृत व नोंदणीकृत फेरफार यांची प्रलंबितता कमी करणेबाबत नाशिक विभागात उल्लेखनीय कामकाज झाले असून नाशिक विभागातील नंदुरबार, अहमदनगर, जळगांव, धुळे व नाशिक हे जिल्हे राज्यात अनुक्रमे एक ते पाच स्थानी आहेत. तसेच नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर तर जळगाव जिल्हा तिस-यास्थानी असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

ई-फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांचे अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा नियमित घेण्यात आलेला आहे. नाशिक विभागातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अथक मेहनत घेऊन राज्यात ई-फेरफार प्रणालीमधील प्रलंबित फेरफार यांची प्रलंबितता कमी करून विभागातील जनतेला दिलासा देणारे कामकाज केले आहे, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

महसूल विभागाच्या ई फेरफार प्रकल्पातील सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिकाला सोप जावे म्हणून महाभूमी हे http://mahabhumi.gov.in/संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून या संकेतस्थळाच्या आधारे कोणालाही महसूल विभागाच्या सर्व सशुल्क आणि निशुल्क सेवांचा लाभ घेता येणार आहे, अशी माहितीही विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी दिली आहे.

दृष्टिक्षेपात कामगिरी
या क्रमवारीत नंदुरबार जिल्हा पहिला आला असून त्यात 97.97 टक्के काम पूर्ण झाले आहेत, त्याच्या पाठोपाठ अहमदनगर जिल्हा आहे ज्यात 97.81 काम पूर्ण झाली आहेत. तिसर्‍यासाठी जळगाव जिल्हा आहे ज्यात 97.80 टक्के काम झाली आहेत. चौथ्या व पाचव्या स्थानी धुळे व नाशिक जिल्हा आहे ज्यात क्रमाने 97.76 टक्के व 97.59 टक्के काम झाली आहेत.