नवी दिल्ली- पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य सुरजीत भल्ला यांनी आज त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी काल सोमवारी राजीनामा दिला. आता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुरजीत यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
उर्जित पटेल यांच्यापाठोपाठ सुरजीत भल्ला यांच्या राजीनाम्यामुळे मोदी सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. आर्थिक व राजकीय वर्तुळात या या राजीनाम्यांचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने सप्टेंबर २०१७ मध्ये या आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली होती. नीती आयोगाचे सदस्य डॉ. विवेक देबरॉय हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. आर्थिक विषय तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या अन्य विषयांबाबत सरकारला विशेषत: पंतप्रधानांना सल्ला देण्याची जबाबदारी या परिषदेवर असते. ही परिषद स्वायत्तरित्या काम करते.