सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले

आम्ही घटनात्मक बाबींची काळजी घेऊनच सरकार स्थापन केलं

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या सत्ता संघर्षावरील निकाल आज सुनावला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार असल्यामुळे, ते आमदार पात्रच आहेत यात काही शंका नाही. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्या लोकशाहीत अपेक्षित निकाल लागला आहे. अखेर सत्याचा विजय झाला. लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. आपल्या देशात संविधान, कायदे आणि नियम आहेत. कोणालाही त्याबाहेर जाता येत नाही. कायदेशीर बाबींची पुर्तता करून आम्ही बहुमताचं सरकार बनवलं आहे. सुप्रीम कर्टाने आमच्या सरकारवर आता शिक्कामर्तब केला आहे.

काही लोक आम्हाला घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार म्हणून स्वत:च समाधान करून घेत होते. स्वत:ची पाठ थोपटत होते. या लोकांना सुप्रीम कोर्टाने चपराक लगावली आहे. आम्हाला घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना सुप्रीम कर्टाने कालबाह्य ठरवलं आहे. दरम्यान, प्रकरण सुप्रीम कोर्टात असताना निवडणूक आयोगाना या प्रकरणी निर्णय कसा घेतला, असा सवाल केला जात होता, त्यावरही सुप्रीम कर्टाने भाष्य केलं आहे. निवडणूक आयोगाला हा अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला ओळख दिली आणि पक्षचिन्ह आम्हाला दिलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने अपेक्षित निकाल दिला. आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले. त्यावेळचं सरकार अल्पमतात आलं होतं. आम्ही घटनात्मक बाबींची काळजी घेऊनच सरकार स्थापन केलं आहे. त्यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय होता? आम्ही हा निर्णय घेताना जनमताचा आदर केला आहे. खरंतर नैतिकता कुणी जपली, हे मला सांगण्याची गरज नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.