लोकसभेच्या निवडणुका आयोगाने योग्य पद्धतीने घेतल्या: प्रणव मुखर्जी

0

नवी दिल्ली: देशात एकीकडे विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग हा भाजपचा चेला असल्याचे म्हटले आहे,तर दुसरीकडे याच निवडणूक आयोगावर भारताचे माजी राष्ट्रपती, तथा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे. देशातल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुका, आयोगाने चांगल्या पद्धतीने घेतल्या गेल्याचे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले. देशात योग्य पद्धतीने निवडणुका घेतल्या गेल्याने लोकशाही यशस्वी ठरली असेही ते म्हणाले.

प्रणव मुखर्जी यांच्या वक्त्यव्याने देशातील विरोधी पक्ष काय म्हणतात ते पाहणे आता महत्वाचे ठरेल. सुकुमार सेन ते आताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोडा यांनी देशातील निवडणूक योग्य पद्धतीने हाताळली आहे. अशा शब्दात त्यांनी आयोगाचे कौतूक केले आहे. देशात लोकसभा निवडणुका ७ टप्प्यात झाल्या असून, प्रत्येक टप्प्यात आयोगाने चांगले काम केले आहे. तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकत नाही असेही ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावरून मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगावर टीका झाली होती. तसेच आदर्श आचारसंहिता भंग केलेल्या तक्रारींवर आयोगाने कारवाई केली नाही. त्यावर विरोधी पक्षांनी टीका केली होती.त्या दरम्यान आयोगाच्या तिन्ही आयुक्त यांच्यामधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर ट्वीट करत आयोग हा पंतप्रधान मोदी यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे असा आरोप केला होता.