नवी दिल्ली: काल पश्चिम बंगालमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोमध्ये जोरदार राडा झाला. यात वाहनांची जाळपोळ करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला. दरम्यान यावरून अमित शहा यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर शंका उपस्थित करत आरोप केले आहे. निवडणुकांदरम्यान गोंधळ घालणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून देशभरात १०७ कलमाचा वापर केला जातो. मात्र, पश्चिम बंगालमध्ये असं होताना दिसत नाही, त्यामुळे निवडणूक आयोग देशात एक आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी अशी दुटप्पी भुमिका कसे काय घेऊ शकते? असा सवाल करताना यामुळे आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, अशा शब्दांत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.
निवडणूक आयोगाने याप्रकरणी त्वरीत कारवाई केली पाहिजे, अशी मागणी करताना तृणमुल काँग्रेसच्या गुंडांना पकडल्याशिवाय येथे निष्पक्ष निवडणूक होणार नाही, असेही शाह यांनी म्हटले आहे. ममता दीदींनी दोन दिवसांपूर्वीच भाजपाला बदला घेण्याची धमकी दिली होती. मात्र, तरीही त्यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाकडून बंदी का घालण्यात आली नाही, असा सवालही यावेळी त्यांनी केला.
अमित शहा यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पश्चिम बंगालमध्ये व्होटबँकेच्या राजकारणसाठी हिंसाचार सुरु आहे. मात्र, तृणमुल काँग्रेसची उलटी मोजणी आता सुरु झाली आहे. हारणारी बाजी विजयामध्ये पलटवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारावरुन हे निश्चित झाले आहे असे आरोप अमित शहा यांनी केले आहे.