ओडीसात ‘फनी’ वादळाचे थैमान; 3 जण ठार, १२ लाख नागरिकांचे स्थलांतर

0

पुरी:ओडिशातील पुरीच्या किनारपट्टीवर धडकलेल्या ‘फनी’ चक्री वादळाने ओडिशात थैमान घातला आहे. या वादळामुळे येथील घरे, वृक्ष जमीनदोस्त झाली असून अनेक भाग पूरस्थिती निर्माण झाली आहे. या वादळामुळे आतापर्यंत ३ जणांचा बळी गेला असून १२ लाख नागरिकांची सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. गेल्या तीन दशकातील ओडिशामधील हे सर्वात मोठे वादळ असून या वादळामुळे राज्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

आज सकाळी ८ वाजता फनी चक्रीवादळाने पुरीच्या किनारपट्टीवर धडक दिली. त्यामुळे पुरीच्या किनारपट्टीवर ताशी १७५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले. त्यानंतर हवेचा वेग वाढून ताशी २४५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले. समुद्रातही उंचच उंच लाटा उसळू लागल्या आणि अनेक घरात पाणी शिरायला सुरुवात झाली. वादळाबरोबरच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानं ओडिशातील अनेक भाग जलमय झाले. ज्या भागात फनी वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आणि बसण्याची शक्यता आहे, अशा भागातील १२ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गुरुवारी ११ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. सुमारे १० हजार गावे आणि ५२ शहरातून या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे