नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून देशभरातील शेतकरी कृषी कायद्याविरोधात दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. संपूर्ण जगात या आंदोलनाची चर्चा आहे. आंदोलनाला २६ जानेवारीला हिंसक वळण लागले होते. दरम्यान दुर्दैवी म्हणजे आंदोलनातील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात मोदी सरकारचा उल्लेख करण्यात आला असून कृषी कायद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. टिकरी सीमेवर या शेतकऱ्याने रात्री उशिरा गळफास घेतला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव दरियाव सिंह (५०) आहे. आज रविवारी सकाळी शेतकऱ्यांना दरियाव यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आणि एक सुसाईड नोट देखील आढळून आली.
आत्महत्या केलेला शेतकरी काही दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनात सामील झाला होता. जींदच्या सिंहवाला येथील ते रहिवाशी होते.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यानं सुसाईड नोटमध्ये मोदी सरकारला जबाबदार धरले आहे. “भारतीय किसान युनियन झिंदाबाद. मोदी सरकार केवळ तारखांवर तारीख देत आहे. हे काळे कायदे केव्हा रद्द होतील याची काहीच शाश्वती नाही”, असे चिठ्ठीत लिहिले आहे.