चीन दौऱ्यात भारताला काय मिळाले?

0

नवी दिल्ली- चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या वर्षी दिलेलं आमंत्रण स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन येथे गेले. दोन दिवसाच्या मुक्कामानंतर ते आता मायदेशी येण्यासाठी निघाले आहे. त्यांचा हा दौरा अनौपचारिक असला तरी यातून भारताला खूप काही मिळाले आहे. प्रामुख्याने ५ गोष्टी भारताला मिळाले आहे.

त्यात पहिली बाब अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करून आर्थिक पातळीवर एकत्र काम करण्यास भारत-चीनमध्ये एकमत झाले आहे. अफगाणिस्तानातील दहशतवाद मिटवण्यासाठी चीनची साथ मिळणं ही जमेची बाजू आहे. दुसरी बाब भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनेही दोन नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. २००५मध्ये जे निकष निश्चित करण्यात आले होते, त्या आधारावरच विशेष प्रतिनिधी दुसऱ्या टप्प्यात चर्चा करतील, असं यावेळी ठरवण्यात आले आहे.

तिसरी बाब भारत-चीन सीमेवर शांतता-स्थैर्य राहावं, यादृष्टीने दोन्ही देश आपापल्या लष्कराला आचारसंहिता देणार आहेत. त्यामुळे पुन्हा डोकलामसारखी परिस्थिती निर्माण न होण्यास मदत होऊ शकेल. चौथी बाब द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक अधिक संतुलित आणि टिकाऊ करण्याच्या दृष्टीने दोन्ही देश पावलं टाकणार आहेत.

पाचवी बाब मोदी आणि जिनपिंग यांच्यातील मैत्रीचं नातं या भेटीमुळे आणखी दृढ झालं आहे. हुबई म्युझियममध्ये जिनपिंग स्वतः मोदींसोबत गेले, त्यांना ऐतिहासिक कलाकृती दाखवल्या. २० मिनिटांऐवजी ते ४० मिनिटं तिथे होते आणि गप्पांमध्ये रंगले होते. या मैत्रीमुळे दोन देशांमधील संवाद वाढून वाद मिटण्यास फायदा होऊ शकतो.