पिकअप दरीत कोसळल्याने भीषण अपघातात चार ठार, तीन जण जखमी

नंदूरबार l प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात पिकअप दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,

धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात पिकअप

( एम.एच. 43, ए.डी.1818) वाहनाचा भीषण अपघात झाला आहे.नागमोडी वळणाचा आणि तीव्र उताराचा हा चांदसैली घाट असून नागमोडी वळणावरून ३ पलटी खात गाडी खोल दरीत कोसळली.या अपघातात तुकाराम दिवल्या ठाकरे ( वय 25 ),अमरसिंग शंकर ठाकरे ( वय 30 ),

मुकेश तेजला ठाकरे (वय 22) तिन्ही रा. वावी, ता.धडगाव, विरसिंग रमेश पावरा( वय 35) रा. बोदला, ता.धडगाव यांचा मृत्यू झाला.तर अपघातात वसंत साकऱ्या ठाकरे ( वय ३३), स्वरूपसिंग साकऱ्या ठाकरे ( वय २०), स्वरूपसिंग साकऱ्या ठाकरे ( वय २०), गणेश साकऱ्या ठाकरे ( वय १५)

यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याची जोडणारा आणि कमी अंतराचा मार्ग हा चांदसैली घाट असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवासी वाहतूक होत असते. गेल्या दोन वर्षांपासून या घाटाची अत्यंत दुरावस्था झाली आहे.जागोजागी रस्ता खचलेला असून नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात.यातच खराब रस्त्यांमुळे हा भीषण अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे.नंदुरबार जिल्‍ह्यातील चांदशैली घाट हा तिव्र उतार व वळणाचा असल्‍याने येथे अनेक अपघात होत असतात. यात उतारामुळे वाहन अनियंत्रीत होवून दरीत कोसळल्याने अपघात झाला.रात्री उशिरा पर्यंत तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.