गोवा, मणिपूर आणि मेघालयचा नियम कर्नाटकातही पाहिजे: सीताराम येचुरी

0

बंगळूर-गोवा, मणिपूर आणि मेघालयमध्ये सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे हाच नियम कर्नाटकातही लागू व्हायला हवा असे मत सीपीआयचे(एम) महासचिव सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले आहे. तसेच भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र रहावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. त्यावर, भाजपाने माझा पक्ष फोडण्यासाठी कितीही दबाव आणला तरीही मी धर्मनिरपेक्ष पक्षांची साथ सोडणार नाही असा विश्वास माजी पंतप्रधान देवेगौडांनी त्यांना दिला.

ट्विटरद्वारे मत प्रदर्शन

भाजपा सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांनी गोवा, मणिपूर आणि मेघालयात सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले नव्हते. २०१७ मध्ये गोव्यात ४० जागांपैकी १७ जागा काँग्रेसकडे होत्या. मणिपूरमध्ये ६० जागांपैकी २८ जागा काँग्रेस जिंकली, तर मेघालयातही ६० पैकी २१ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेची संधी दिली नव्हती, त्यामुळे आता याच नियमांचे  पालन व्हायला हवे असे ट्विटरद्वारे येचुरी म्हणाले.

येचुरी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या एका ट्विटचं उदाहरणही दिले. ज्यामध्ये जेटलींनी सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेची संधी मिळावी असे म्हटले  आहे. भाजपावर निशाणा साधताना, निवडणूक पराभूत व्हावे  आणि सरकार बनविण्यात  भाजपा माहिर असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.