मुंबई : राज्यातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी राज्य सरकारने नवीन हेलिकॉप्टर विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सिर्कोस्की कंपनीचे S76-D हे हेलिकॉप्टर सुमारे १२७ कोटी रुपयांना विकत घेतले जाणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने हा निर्णय गेल्या महिन्यात घेतला होता. मंगळवारी म्हणजे काल याबाबत शासन निर्णयाद्वारे हेलिकॉप्टर खरेदीचा निर्णय अखेर जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी लातूर येथे जात असतांना मुख्यमंत्री यांचे हेलिकॉप्टरचे अपघात झाले होते. तपासानंतर ते दुरुस्तीच्या पलीकडे गेल्याचे स्पष्ट झाले होते. लातुर दुर्घटनेनंतर जवळपास एक वर्षांनी आता राज्य सरकारने नवीन हेलिकॉप्टर खरेदीचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी पुढील महिन्यापासून पावसाळा सुरू होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या काळांत हेलिकॉप्टरचा फारसा वापर केला जाणार नाही. त्यातच नवीन हेलिकॉप्टर प्रत्यक्ष राज्यात दाखल होईपर्यंत काही काळ लागणार आहे. हेलिकॉप्टरची क्षमता १३ प्रवासी वाहून नेण्याची आहे.