स्वत: आरोग्य मंत्र्यांनीच घेतले कोरोना लसीचे ट्रायल

0

चंडीगढ: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 90 लाखांपुढे गेली आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाला सुरवात होऊन वर्षपूर्ती झाली असली तरी अद्याप कोणत्याही देशाला कोरोनाची लस निर्मिती करण्यात यश आलेले नाही. जगभरात कोरोना लसीच्या निर्मितीवर काम सुरु आहे. अनेक देशांनी लसीची मानवी चाचणी सुरु केली आहे. भारतातही मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. विशेषबाब म्हणजे हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांनी स्वत:ला कोरोना चाचणीसाठी स्वयंसेवक घोषित केले होते. आज त्यांनी स्वत:वर  कोरोनाची ट्रायल लस घेतली.

भारतात देखील स्वदेशी निर्मितीची लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहे. भारत बायोटेक या कंपनीने लस निर्मिती सुरु केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात झालेली आहे. तिसऱ्या टप्प्यात मानवी शरीराने प्रतिसाद दिल्यास लस उपलब्ध होणार आहे. पुढील तीन ते चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध होईल असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे.