नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्याने केली शेतातच कांद्याची होळी
नाशिक | प्रतिनिधी
जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर कांद्याची होळी करण्याची वेळ आली आहे. येवला तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांनी अकरा वाजता कांद्याची होळी केली. कारण कांद्याला हमीभावच मिळत नाही. कांद्याचे पीक घ्यायला जितका खर्च शेतकऱ्यांना आला आहे. तितका बेसिक खर्च सुद्धा भरून निघत नसल्यामुळे शेतकऱ्याने दीड एकरवरील कांद्याची होळी केल्याचे समोर आले आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांदा हमी भावाचा प्रश्न हा अत्यंत गंभीर होत चाललेला आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले आहे. एका शेतकऱ्याने कांद्याची होळी केली आहे.
कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने पंधरा दिवसांपूर्वी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केल्याची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. अखेर आजच्या होळीच्या दिवशी सरकारच्या धोरणाला वैतागून या शेतकऱ्याने तब्बल दीड एकरावरील कांद्याला अग्निडाग दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. शेतकऱ्यांचे जगणे सरकारला मान्य नाही. उत्पादकांनी कष्टाने पिकवलेला कांदा जाळून टाकला आहे. आजचा दिवस काळा दिवस आहे. शेतकरी जगला काय आणि मेला काय सरकारला देणे- घेणे नसल्याचे सांगत शेतकऱ्याने व्यथा मांडली.
गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात मोठी घसरण झाल्याने जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या चिंतेत आहे. सरकारने नाफेडकडून कांदा खरेदीची घोषणा केली असली तरी त्याबाबत शेतकरी फार समाधानी नाही. परिणामी शेतकऱ्यांचा केंद्र आणि राज्य सरकारांवर रोष आहे. याच पार्श्वभूमीवर कांदा दरांतील सततच्या घसरणीला वैतागून येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकऱ्याने होळीच्या मुहूर्तावर मोठे पाऊल उचलले आहे. कृष्णा डोंगरे नामक या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी करून सरकारी अनास्थेचा निषेध नोंदवला आहे.
रात्रंदिवस मेहनत करून देखील कांद्याला हमीभाव मिळत नाही. आज त्यांचा कुटुंब शेतीवर चालतं. आज दीड एकरवर सव्वा लाख रुपये खर्चून कांद्याचे पीक घेतले होते. मात्र कांदा दरात झालेली घसरण, त्यानंतर सरकारची फसवी आश्वासने, नाफेडची कांदा खरेदी यातून हे पाऊल उचलल्याचे आंदोलनात सहभागी झालेल्या एका महिलेने सांगितले.
नाफेड पूर्णपणे शेतकरी विरोधी
नाशिक जिल्ह्यात कांदा दरातील घसरण सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. कांदा दरातील घसरणीपाठोपाठ शेतकऱ्यांनी आंदोलने केलीत. मात्र, तरी देखील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आज कृष्णा डोंगरे यांनी टोकाचे पाऊल उचलत शेतात ठिकठिकाणी सरण रचून कांदा पेटवून देत संताप व्यक्त केला. यावेळी कृष्णा डोंगरे म्हणाले की, आज दीड एकर कांदा काढून उपयोग नाही. कांद्याला आतापर्यंत सव्वा लाख रुपये खर्च लागलेला आहे. आणि बाजारात गेलो तर आणखी तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा कांदा जाळण्याची वेळ माझ्यावर आलेली असून सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. नाफेड ही संस्था पूर्णपणे शेतकरी विरोधी असून ती ग्राहकांसाठी काम करीत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.