मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत सेना, भाजपा युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला तरी, नवीन सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेना, भाजपामध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल येत्या सात दिवसात सत्तास्थापन झाली नाही तर, राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे सांगत सेनेवर दबाव वाढवण्याचा पर्य्तंह केला होता. शिवसेनेने प्रत्युत्तर दिले असून, मावळत्या सरकारातील विझलेले काजवे रोज नवे विनोद घडवून महाराष्ट्र राज्याला अडचणीत आणू पाहत आहेत. धमक्या, तपास यंत्रणांची जोरजबरदस्ती यांचा काही एक परिणाम न झाल्याने मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नव्या धमकीचा पाद्रा पावटा सोडला असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे एक विनोदी शोभायात्राच बनली आहे. शिवरायांच्या महाराष्ट्राची अशी विनोदी शोभायात्रा झाली असेल तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी? सध्याचा गोंधळ म्हणजे ‘शिवशाही’ नाही.’7 नोव्हेंबरपर्यंत सत्तेचा तिढा न सुटल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल.’ श्री. मुनगंटीवार व त्यांच्या पक्षाच्या मनात नेमके कोणते विष उसळते आहे ते या वक्तव्यावरून दिसते. एक तर राष्ट्रपती आमच्या मुठीत आहेत किंवा राष्ट्रपतींच्या सहीशिक्क्याचा रबरी स्टॅम्प राज्यातील ‘भाजप’ कार्यालयात पडून आहे आणि आमचे राज्य आले नाही तर त्या रबरी शिक्क्याचा वापर करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची आणीबाणी लादू शकतो असा या धमकीचा अर्थ आहे असे जनतेने समजायचे का?, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.
राष्ट्रपती राजवटीची सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली धमकी लोकशाहीविरोधी तसेच घटनाबाह्य आहे. हा महाराष्ट्राच्या आणि विधानसभा निवडणुकीत दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे. प्रश्न इतकाच आहे की महाराष्ट्रात सरकार का बनत नाही याची कारणे कोणी द्यायची? सरकार बनत नाही म्हणून राष्ट्रपती लागू करण्याची धमकी द्यायची ही तर मोगलाई आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे.