वॉशिंग्टन: भारतात गेल्यावर्षी अल्पसंख्यांक समाज, मुस्लीमांवर हल्ले झाले असून ते हल्ले रोखण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचा ठपका अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. हे हल्ले गोहत्या संशयावरून झाले आहे असे या म्हटले गेले आहे. प्रसिद्ध झालेला अहवाल भारताच्या परराष्ट मंत्रालयाने फेटाळून लावला आहे.
‘इंटरनॅशनल रिलीजियस फ्रीडम इंडिया २०१८’ या नावाने हा अहवाल शनिवारी प्रसिद्ध झाला. त्यात गेल्यावर्षी भारतात गोहत्या, बीफ सेवन यावरून मोठ्या प्रमाणात हिंदू संघटनांनी हल्ले केले आहेत. धर्म आणि गोरक्षेच्या नावावर करण्यात येत असलेले हल्ले रोखण्यात मोदी सरकारला मोठ्या प्रमाणात अपयश आले आहे, असे म्हटले आहे. सरकारवर टीका करणाऱ्या व्यक्तींवर हल्ले करण्यात आले असून हे हल्ले भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी चिथावणीखोर भाषण केल्याने झाले आहेत असेही म्हटले आहे.
अहवालातील गृह विभागाचा हवाला देत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी म्हटले की, २०१५ ते २०१७ च्या दरम्यान भारतात सांप्रदायिक घटनेत ९ टक्के वाढ झाली आहे. २०१७ मध्ये ८२२ घटनांत १११ लोकांचा मृत्यू झाला तर २३८४ लोक जखमी झाले आहेत. या अहवालात जम्मू-काश्मीरमधील कठुआत झालेल्या ८ वर्षीय मुस्लीम मुलीचे अपहरण, हत्येच्या समावेश करण्यात आला आहे.
अहवाल भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला असून, भारतीय संविधानाने अल्पसंख्याक समाजासह देशातील सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहेत. परदेशी संस्थेला भारतीय नागरिकांच्या संविधानिक अधिकारावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असे भारताचे परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले.