भारताचा मोठा विजय; कुलभूषण जाधवच्या फाशीला स्थगिती !

0

हेग: कथित हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या निर्णयाबाबत आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होती. यात भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. जाधव यांच्या फाशीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिवाय त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची परवानगीही देण्यात आली आहे. भारताच्या दृष्टीने हा मोठा विजय मानला जात आहे. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष होते. भारताने कुलभूषण जाधवच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले आहे.

भारताच्या बाजून १५ विरुद्ध १ अशा मतांनी हा निकाल देण्यात आला. मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ निकाल वाचन केले. कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. पाकिस्तान जाधव यांना दिलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करत नाही तोपर्यंत जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात येत असल्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायायलायने दिला. तसेच न्यायालयाने जाधव यांना काउन्सिलर अॅक्सेसही (दूतावासाशी संपर्क) दिला.

कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केली होती. कुलभूषण जाधव कमांडिंग ऑफिसर दर्जाचे नौदलातील अधिकारी आहेत व ते भारतातील ‘रॉ’साठी काम करीत असल्याचा दावा पाकिस्ताने केला होता. कुलभूषण जाधव हे पाकमध्ये हेरगिरी करीत होते, असा आरोपही पाकने केला होता. इराणमार्गे जाधव यांनी पाकमध्ये प्रवेश केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे होते.