नवी दिल्ली: काही दिवसांपासून देशातील कोरोनाचा वेग मंदावत असल्याचे चित्र आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून रिकव्हरी वाढली आहे. जगात सर्वाधिक रुग्णांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७१ लाखांच्या पुढे गेली आहे. मागील २४ तासांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. देशासाठी ही दिलासादायक बाब आहे. मागील २४ तासात देशात ६६ हजार ७३२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या ७१ लाख २० हजार ५३९ इतकी झाली आहे. यामध्ये ८ लाख ६१ हजार ८५३ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर ६१ लाख ४९ हजार ५३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्या १ लाख ९ हजार १५० इतकी झाली आहे.
रिकव्हरीच्या बाबतीत भारत जगात पहिल्या स्थानी आहे. भारतातील रिकव्हरी रेट ८६.३६ टक्के आहे. तर सध्या १२.१० टक्के रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांत सर्वाधिक म्हणजे ६१ टक्के रुग्ण असून, या राज्यांत बरे होणाऱ्यांचे प्रमाण ५४.३ टक्के आहे.
भारतातील कोरोना चाचणीचे प्रमाणही वाढले आहे. मागील २४ तासात ९ लाख ९४ हजार ८५१ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ६६ हजार ७३२ नमुने पॉझिटिव्ह आलेत. आतापर्यंत देशात ८ कोटी ७८ लाख ७२ हजार ०९३ कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७१ लाख २० हजार ५३९ इतके पॉझिटिव्ह आढळले आहे.