माऊंट मोनगानुई- भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील आज तिसरा सामना झाला. यात विजय मिळवीत भारताने मालिका खिशात घातली आहे. भारताने न्यूझीलंडवर ७ गडी राखत सहज मात केली. या विजयाने भारताने मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे.
२००९ नंतर भारतीय संघाने प्रथमच न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आजच्या निकालामुळे त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिकच्या विक्रमाशी बरोबरी केली.
न्यूझीलंडच्या २४३ धावांचा पाठलाग भारताने फक्त तीन फलंदाज गमावत पूर्ण केला. रोहित शर्माने संयत फलंदाजी करताना तीन चौकार आणि दोन षटाकारांच्या जोरावर ६२ धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीने ६० धावांची खेळी साकारली. अंबाती रायुडू (नाबाद ४०) आणि दिनेश कार्तिक (नाबाद ३८) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मोहम्मद शमीने भेदक मारा करत न्यूझीलंडच्या धावसंख्येला वेसण घातली. अन्य गोलंदाजांनी शमीला सुयोग्य साथ दिल्यामुळे न्यूझीलंडला अडीचशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही.