हाय होल्टेज भारत-पाक सामन्याच्या तिकीटाची दोनच दिवसात विक्री

0

नवी दिल्ली: यामहिन्याअखेर २०१९ विश्वचषकाची सुरुवात होणार असून भारत-पाकिस्तान संघात १६ जूनला मॅन्चेस्टर शहरातील ओल्ड ट्रॅफॉर्ड स्टेडियमवर सामना रंगणार आहे. भारत-पाकिस्तानच्या सामन्याकडे विशेष लक्ष असते. भारत-पाक संघाला कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाते. दरम्यान या सामन्याची सगळी तिकीटे विक्री सुरु झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत विकली गेली आहेत. भारत-पाकिस्तानच्या सीमेवर प्रचंड तणाव असला तरी दोन्ही देशातील चाहत्यांची क्रिकेटची ओढ मात्र काही कमी झालेली नाही.

आतापर्यंत विश्वचषकात एकदाही पाकिस्तान भारताला हरवू शकलेला नाही. २०१५मध्ये विश्वचषकात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमींनी त्यांचे टीव्ही फोडल्याच्या घटनाही घडल्या होत्या. पुलवामाच्या घटनेनंतर पाकिस्तानशी विश्वचषकात एकही सामना खेळणार नाही अशा घोषणाही भारतात देण्यात आल्या होत्या. पाकिस्तानला विश्वचषक खेळू देऊ नका अशी मागणीही बीसीसीआयने आयसीसीकडे केली होती. पण अखेर यातून बीसीसीआयने माघार घेत पाकिस्तानशी खेळण्यास होकार दिला होता.

दोन्ही देशांमध्ये इतका तणाव असतानाही सामन्याची सगळी तिकीटं विकली गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मॅन्चेस्टरच्या याच मैदानावर भारत आणि वेस्टइंडिजमध्ये २६ जूनला सामना रंगणार आहे. या सामन्याच्या तिकीटांची विक्री मात्र खूपच तुरळक प्रमाणात होते आहे. भारत-पाक सामन्याची तिकीट विकत घेणाऱ्यांमध्ये भारतीयांचीच संख्या अधिक आहे. तेव्हा यंदा भारत पुन्हा एकदा पाकिस्तानला विश्वचषकात धुळ चारणार की पाकिस्तान भारतावर विजय मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.