आर्थिक मंदी मोदी सरकारनिर्मित: मनमोहन सिंह

0

नवी दिल्ली: सध्या देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने अनेक उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, अनेक कंपन्यांनी कर्मचारी कमी केले आहे. यावरून सरकारवर टीका होत आहे. दरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या जीडीपी दरात झालेल्या घसरणीबद्दल मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून मोदी सरकारच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

‘गेल्या तिमाहीत जीडीपी विकास दर ५ टक्के होता. यातून हे स्पष्ट होते, की देश मोठ्या स्लोडाऊनमधून जात आहे. भारताकडे जास्त वेगाने विकास करण्याची क्षमता आहे, पण मोदी सरकारच्या अव्यवस्थापनामुळे परिस्थिती बिघडली आहे. उत्पादन क्षेत्राचा विकास अवघा ०.६ टक्के आहे. आपली अर्थव्यवस्था नोटाबंदीसारख्या मानवनिर्मित चुकांमधून अद्याप बाहेर आलेली नाही, हेच यातून स्पष्ट होतं. याव्यतिरिक्त चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळेही अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे असे ते म्हणाले.

एकट्या ऑटोमोबाइल क्षेत्रात साडेतीन लाख नोकऱ्या गेल्या आहेत. याव्यतिरिक्त असंघटित क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर नोकरकपात झाली आहे, परिणामी मजुरांसमोर रोजच्या उपजिवीकेचे संकट उभे राहिले असल्याचे डॉ. मनमोहन सिंह म्हणाले. ग्रामीण भागातही परिस्थिती वाईट आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य भाव मिळत नाहीए आणि उत्पन्नात सतत घसरण होत आहे. मोदी सरकार कमी महागाई दराला आपलं यश म्हणवते आहे, पण यासाठी सरकारने शेतकऱ्यांची किंमत मोजली आहे, असंही सिंह यांनी लक्षात आणून दिलं.