जकार्ता- इंडोनेशियामध्ये पुन्हा सुनामी आली आहे. या सुनामीममध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६००हून अधिक जण जखमी आहेत. जावाचा दक्षिणी भाग आणि दक्षिणी सुमात्राच्या किनाऱ्यावरील आलेल्या या सुनामीने इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत. ही सुनामी स्थानिक वेळेनुसार काल शनिवारी रात्री ९.३० वाजता आली.
ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने समुद्राच्या आत भूस्खलन झाले आणि लाटा मोठ्या प्रमाणात उसळल्या. त्यानंतर या लाटांनी सुनामीचे स्वरूप धारण केले. इंडोनेशियातील भूवैज्ञानिकांनी या सुनामीच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीही इंडोनेशियाला अशाच भूकंपाचा जोरदार धक्का बसून त्यापाठोपाठ सुनामी आली होती. त्या सुनामीमुळे इंडोनेशियामध्ये १७६३ जणांचा मृत्यू झाला होता. अनेक लोक बेपत्ता होते. सुलावेसी बेट परिसरात २८ सप्टेंबर रोजी ७.५ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला व सुनामीचेही संकट ओढावले. याचा मोठा फटका पालू-पेटोबो व बालारोआ या दोन भागांना बसला. तेथील इमारती कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली कित्येक लोक दबले गेले होते. त्यातील अनेकांची बचावपथकांनी सुखरूप सुटका केली; परंतु तरीही अद्याप पाच हजार जण बेपत्ता होते.