नवी दिल्ली : कर्नाटकमधील राजकीय नाट्य आता सर्वोच्च न्यायालया पोहोचले आहे. कर्नाटकचे काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राजीनाम्यासंदर्भात बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालय गाठले आहे. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी राजीनामा स्वीकारण्यास उशीर केल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात आता याप्रकरणी उद्या गुरुवारी ११ रोजी सुनावणी होणार आहे. कॉंग्रेसकडून अभिषेक मनू संघवी युक्तिवाद करणार आहे.
दरम्यान या प्रकरणी संसदेच्या अधिवेशनात देखील पडसाद उमटतांना दिसत आहे. राजसभेत कॉंग्रेस खासदारांनी कर्नाटकमधील राजकीय अस्थिरतेला भाजप जबाबदार असल्याचे म्हणत गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचे कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.
दरम्यान, मुंबईमध्ये असणारे काँग्रेसचे बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांनी आज संध्याकाळपर्यंत आणखी चार आमदार मुंबईत पोहोचतील असा दावा केलाय. जारकीहोळी यांच्या दाव्यानं पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडालीय. मात्र हे आमदार कोण याची बंगळुरूत जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेले कर्नाटकमधील जेडीएस-काँग्रेस मैत्री सरकार अधिक संकटात येऊ शकते, अशी शक्यता आहे.
तर दुसरीकडे कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे.