पटना: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना झारखंड हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. चारा घोटाळ्यातील एका देवघर कोषागार प्रकरणात त्यांना हायकोर्टाने आज शुक्रवारी जामीन मंजूर केला, असे असले तरी दुसऱ्या एका प्रकरणात जामीन मिळाला नसल्याने तुरुंगातच रहावे लागणार आहे. चारा घोटाळ्यातील देवघर कोषागार प्रकरणी शिक्षेचा अर्धा काळ संपल्याचे कारण सांगत लालू प्रसाद यादव यांच्यावतीने झारखंड हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने यादव यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
या सुनावणीदरम्यान कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना आपला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, चाईबासा-दुमका कोषागार प्रकरणी त्यांना अद्याप जामीन मिळू शकलेला नाही. त्यामुळे त्यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे. दरम्यान, या जामीनामुळे लालू यादव यांच्यासाठी दिलासादायक गोष्ट ही आहे की, ते आपल्या वकीलांमार्फत देवघर कोषागार प्रकरणात मिळालेल्या जामीनाचा आधार घेत दुमका-चाईबासा कोषागार प्रकरणात जामीनासाठी याचिका दाखल करु शकतात.