लालू प्रसाद यादव यांना जामीन, मात्र सुटका नाही

0

नवी दिल्ली: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना एका प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र जामीन मंजूर होऊनही ते तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. चारा घोटाळा प्रकरणातील चाईबासा प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र दुमका ट्रेझरी प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरु असल्याने लालूप्रसाद यादव यांना तुरुंगाबाहेर येता येणार नाही. चाईबासा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांनी अर्धी शिक्षा पूर्ण केली आहे. अर्धी शिक्षा पूर्ण झाल्यानेच त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

५० हजारांच्या दोन जातमुचलक्यांवर आणि २ लाख रुपये दंड असे जामिनाचे स्वरुप आहे. असंही कोर्टाने सांगितलं आहे. चारा घोटाळ्यातील दुमका प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर झालेला नाही. नोव्हेंबर महिन्यात या प्रकरणातलीही अर्धी शिक्षा लालूप्रसाद यादव पूर्ण करतील. त्यामुळे त्यानंतर जर लालूप्रसाद यादव यांनी याही प्रकरणी जामीन अर्ज दाखल केला आणि तो मंजूर झाला तर नोव्हेंबर महिन्यात ते तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांना मिळालेला एक जामीन हा देखील त्यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जातो आहे.