मुंबई – 13 जणांची बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी (टी-1) वाघिणीला ठार मारण्यात आले. दीड महिन्यापासून वन विभागाचे पथक तिच्या मागावर होते. या घटनेवरुन सरकारवर चहू बाजूने टीका होत आहे. खुद्द केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी यावरून मुख्यमंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जाब विचारले आहे. अवनी वाघिणीला महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीररित्या ठार मारल्याचा गंभीर आरोप केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केला असून कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. यावर मनेका गांधी यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
वाघिणीला ठार करण्याचा निर्णय मंत्री किंवा सचिव घेत नाही. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शिकेनुसार निर्णय घेतल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. वाघिणीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचाही विचार करावा लागतो, अशा शब्दांत त्यांनी मनेका गांधी यांना टोला लगावला. मुनगंटीवार पुढे असेही म्हणाले की, पाच जणांचे बळी गेले, तेव्हाच वाघिणीला पकडण्याचे आदेश दिले होते. मात्र काही प्राणिमित्रांनी हायकोर्टातून त्यास स्थगिती मिळवली.
बेशुद्ध पकडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ
‘अवनी’ वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने वन कर्मचा-यांचा जीव वाचविण्यासाठी नाईलाजाने तिला ठार मारावे लागले. मंत्री आणि सचिव मुंबईत मंत्रालयात बसून वनांचे आणि वन्यजीवांचे रक्षण करत नाहीत. ते शेतकरी व अदिवासी करतात. त्यांच्यामध्ये खूप असंतोष होता. तो दूर केला नसता तर अखेरीस हेच लोक वन्यजीवांचे शत्रू झाले असते,असंही मुनगंटीवार यांनी सांगितले.