चर्चेसाठी मोदी यांचे पाकला पत्र

0

नवी दिल्ली-भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारील देशामध्ये नेहमीच तणावाचे वातावरण असते. या शेजारी राष्ट्रांमध्ये चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाक पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र पाठवून चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. दोन्ही देशांमध्ये सातत्याने चर्चा होणे गरजेचे आहे. शेवटी आपण शेजारी राष्ट्र आहोत. दोघांमध्ये प्रलंबित वाद असून चर्चेशिवाय पर्याय नाही. तसेच अतिधाडस दाखवूनही उपयोग नाही, असे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या दाव्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठवले होते. यात चर्चेबाबतच्या प्रस्तावाचा उल्लेख नव्हता. आता परराष्ट्र मंत्रालय पाकच्या या दाव्यावर अधिकृत प्रतिक्रिया कधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर इम्रान खान यांनी भारताशी चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. शांततेसाठी भारताने एक पाऊल टाकले तर आम्ही दोन पावले पुढे टाकू, असे त्यांनी सांगितले होते.