नवी दिल्ली: आजपासून मोदी सरकार 2 च्या कार्यकाळातील ‘मन की बात’च्या दुसऱ्या भागाला सुरुवात झाले आहे. मोदींनी आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘देशातील कोट्यवधी जनतेला विकास हवा आहे आणि त्यासाठीच जनतेने मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली, अशा शब्दात भावना व्यक्त करत देशातील जनतेचे आभार मानले. निवडणुकीनंतर आपण पुन्हा भेटू असे आपण म्हणालो असताना, मोदींना इतका आत्मविश्वास कसा, अशा शंका उपस्थित करण्यात आल्या असे म्हणत मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. गेल्या काही दिवसांमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम झाला नसल्याने मला प्रत्येक रविवारी काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते असे मोदींनी यावेळी सांगितले.
पाण्याचा प्रश्न हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असून पाण्याचा एक एक थेंब वाचवण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमे, कथा-कीर्तने अशा क्षेत्रात असलेल्या लोकांनी आपापल्या पद्धतीने पाणी वाचवण्याचे अभियान चालवावे असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’द्वारे संवाद साधताना केले. पाणी वाचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
पाण्याच्या संरक्षणासाठी लोकांनी #JanShakti4JalShakti या हॅशटॅगचा उपयोग करत सोशल मीडियावर आपला मजकूर अपलोड करावा, असे आवाहनही त्यांनी लोकांनी केले.
मन की बात कार्यक्रमात जिवंतपणा होता, आपलेपणा होता, त्यात मन गुंतलेले होते आणि याच कारणांमुळे मधला काळ अतिशय खडतर वाटत होता. मन बात कार्यक्रमात भलेही मी बोलत असेन, शब्द माझे असतील, आवाज माझा असेल, मात्र कथा तुमची आहे, पुरुषार्थ तुमचा आहे, पराक्रम तुमचा आहे असे मोदींनी सांगितले.