एमएसपी आहे, होता आणि राहील; मोदींचे संसदेत ठोस आश्वासन

0

नवी दिल्ली: दिल्ली सीमेवर गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याला विरोध म्हणून आंदोलन सुरु आहे. सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यात कृषी कायद्यावर आणि शेतकरी आंदोलनावर भाष्य केले जाणार आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पिकांना एमएसपी (किमान आधारभूत किंमत) कायम राहील, अशी खात्री संसदेत बोलताना दिली. ‘एमएसपी होता, एमएसपी आहे आणि भविष्यातही एमएसपी कायम राहिल’ असे त्यांनी यावेळी सांगितले. नव्या कृषी कायद्यांमुळे पिकांना हमी भाव मिळणार कि, नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात साशंकता असताना पंतप्रधान मोदींनी हमी भाव कायम राहील, असे आश्वासन संसदेत दिले. कृषी कायद्यावरुन निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी त्यांनी शेतकरी नेत्यांना चर्चेचे निमंत्रण दिले.

‘गरीबांना परवडणाऱ्या दरात धान्य उपलब्ध करुन दिले जाईल. मंडींचे आधुनिकीकरण केले जाईल’ असे मोदींनी सांगितले. ‘कृषीमंत्री शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत बोलत आहेत. चिंतेची स्थिती नाही असेही मोदींनी सांगितले.