राष्ट्रीय शेतकरी दिवस; शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

0

मुंबई: आज राष्ट्रीय शेतकरी दिन आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनीही शेतकरी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. मात्र यावेळी त्यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागते. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो.’, असे ट्विटर पवार यांनी केले आहे. अद्यापही शेतकरी आंदोलन थांबविण्यात केंद्र सरकारला यश आले नसल्याने पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारने शेतकरी संघटनांना पाठविलेल्या पत्रावर संयुक्त किसान मोर्चा आज बुधवारी सकाळी बैठक घेत असून लेखी प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. दरम्यान आज आंदोलनाच्या २७ व्या दिवशीही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते जाम केलेत. एका तरुण शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. कृषी मंत्रालयाने पत्र पाठविल्यानंतर मंगळवारी पंजाबच्या ३२ शेतकरी संघटनांनी सिंघू सीमेवर बैठक घेतली. बुधवारी ५०० संघटनांचे नेतृत्व करणारी संयुक्त किसान मोर्चा बैठक घेत असून, या बैठकीत शेतकऱ्यांची पुढील रणनिती ठरणार आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडून लेखी उत्तर पाठविले जाणार आहे.