शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात नवीन उद्योजक तयार करण्यात येणार

0

कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर

मुंबई : स्टार्ट अपच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान तसेच नवनवीन संकल्पनावर आधारित नवीन उद्योजक तयार करण्यात येत आहेत. यामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नवीन उद्योजक निर्माण करण्यात येणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज येथे सांगितले. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताह-2018 चे उद्‌घाटन कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

पाटील-निलंगेकर पुढे म्हणाले, नवीन संकल्पनेवर व नवीन तंत्रज्ञावर उद्योजक निर्माण करण्याच्या दृष्टीने स्टार्ट अप संकल्पना सुरु करण्यात आली आहे. या सप्ताह अंतर्गत नाविन्यपूर्ण उत्पादन व सेवा यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येईल. स्टार्ट अप अंतर्गत शिक्षण, कौशल्य, आरोग्य, शेती, स्वच्छ उर्जा, पर्यावरण, पाणी आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा, दळणवळण, आर्थिक, सायबर सुरक्षा या क्षेत्राचा स्टार्ट अप योजनेत समावेश आहे. या क्षेत्रातील नवीन उद्योजकांनी आपले अर्ज या सप्ताहात 25 ते 31 मे पर्यंत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडे पाठवावयाचे आहेत. यामधील 100 व्यवस्थापन/उद्योजक यांची निवड करुन त्यांना निवड समितीपुढे सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामधून प्रत्येक्ष क्षेत्रातील तीन असे एकूण 24 नवीन उद्योजकांची निवड करुन त्यांना 15 लाखापर्यंतच्या कामाचे कार्यादेश महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन उद्योजकांना (स्टार्ट अप) शासकीय यंत्रणेशी संपर्क व सहयोग पुढील 12 महिन्यासाठी देण्यात येणार आहे. परदेशात व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या वरील 24 उद्योजकांव्यतिरिक्त पाच ते दहा नवीन उद्योजकांना 15 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य परदेशात बाजारपेठ विकसित करण्यासाठी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.