या कारणामुळे आहे वाहन उद्योगात मंदी; अर्थमंत्र्यांनी सांगितले कारण

0

नवी दिल्ली: देशात सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी मंदी सुरु आहे. अनेक कंपन्यांनी नोकर कपात सुरु केले आहे. अर्थव्यवस्थेतील मंदीला हेच मोठे कारण आहे. दरम्यान अर्थव्यवस्थेतील मंदीचे कारण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले आहे. वाहन उद्योगावर सध्या बीएस-6 बरोबरच ओला-उबर कंपन्यांच्या वाहनांचा वाढत्या वापराचा परिणाम झाला असल्याचे दिसत आहे. नवी वाहन खरेदी करण्यापेक्षा ओला-उबरच्या वाहनाचा वापर बरा, अशी लोकांची सध्या मानसिकता झाल्यानेच वाहन उद्योगावर परिणाम झाल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. चेन्नईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

अर्थमंत्री सीतारमन यांनी जीडीपीतील चढ-उतार हा विकास प्रक्रियेचा भाग असल्याचे म्हटले. तसेच केंद्र सरकार देशभरातील आर्थिक मंदी घालवण्यासाठी प्रयत्नशील असून विकासदर वाढवण्यासाठी उपाययोजना करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आगामी तिमाहीत जीडीपीच्या आकडेवारीत वाढ होईल यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे, सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूकही वाढवली आहे, असेही त्या म्हणाल्या.

सरकार वाहन उद्योग क्षेत्रामधील मंदीबाबतही गंभीर असल्याचे सांगत, ऑटो कंपोनंट इंडस्ट्रीच्या मागण्यांबाबतही विचार केला जात असल्याचे त्यांना सांगितले. शिवाय घर खरेदी करणाऱ्यांच्या मागण्यांवर देखील सरकार उपाय शोधत आहेत असे त्या यावेळी म्हणाल्या. आर्थिक मंदीमुळे देशातील वाहन उद्योग संकटात सापडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहनांची विक्री घटत चालली असून, वाहन कंपन्यांकडून रोजगार कपात केली जात आहे.