जळगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र नागरिकांचीच बेफिकीरी कोरोनाला निमंत्रण देत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मास्क न वापरणार्या 154 नागरिकांवर कारवाई करुन 45 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपायुक्त संतोष वाहुळे यांनी केली.
शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा, मनपा प्रशासनाकडून नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, महापालिकेतर्फे गुरुवारी टॉवर चौकात मास्क न वापरणार्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह पथकाने जे नागरिक किंवा वाहनधारकांकडे मास्क नसेल अशांना थांबवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. दरम्यान 154 जणांवर प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, शेखर ठाकूर, भानुदास ठाकरे, दिलीप कोळी, राजू वाघ, राजू गोंधळी, श्री.खाचणे, इकबाल बागवान यांनी केली.
कारवाई दरम्यान वाद
विनामास्क वाहनधारकांवर किंवा नागरिकांवर कारवाईची मोहीम मनपा प्रशासनाने सुरु केली आहे. टॉवर चौकात दुपारी कारवाई करत असतांना काही नागरिकांनी मनपा कर्मचार्यासोबत वाद घातला. दरम्यान उपायुक्त वाहुळे यांनी वाद घालणार्यांना थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.