नवी दिल्ली : देशाच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात १७ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर चार लाख लोक बेघर झाले आहेत. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम या राज्यांना या पुराचा तडाखा बसला आहे. मणिपूरमध्ये पुरामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांतील स्थितीत सुधारणा होत आहे.
अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यात चार जणांना जीव गमवावा लागला आहे. एएसडीएमएने दिलेल्या माहितीनुसार, होजाई, कर्बी आंगलांग पूर्व, कर्बी आंगलांग पश्चिम, गोलाघाट, करीमगंज, हैलाकांडी आणि कछार या भागात अधिकपुराचा तडाखा बसला आहे. या पुराचा फटका ७१६ गावांना बसला आहे. उत्तरपूर्व सीमा रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रणव ज्योती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदरखल दमचारा स्टेशन दरम्यान भूस्खलन झाले आहे. यामुळे लुमडिंग-बदरपूर खंड दरम्यान रेल्वेसेवा ठप्प आहे.