औरंगाबाद :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील समज बांधवांकडून आत्महत्येसारखे टोकाची पाऊले उचलली जात आहे. आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चिन्ह आहे. दरम्यान आज पुन्हा औरंगाबादमध्ये एकाने आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विजयनगर येथील कारभारी शेळके (४३) यांनी शुक्रवारी (10 ऑगस्ट) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
शेळके यांनी घरातील लोखंडी अँगलला गळफास घेतला. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख शेळके यांनी आत्महत्येआधी एका चिठ्ठी मध्ये लिहीली असल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेळकेंना डोक्यावर कर्ज असल्यामुळे मराठा आरक्षण आणि श्रीराम फायनान्सकडून कर्ज वसुलीसाठी होत असलेल्या दबावामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तसेच माझ्या मरणानंतर माझ्या मुलांना आरक्षण द्या अशी मागणी शेळकेंनी चिठ्ठीत केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरुवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर आज ही घटना घडल्याने विजयनगर येथे मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.