इस्लामाबाद : मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली आहे. आम्ही दहशतवाद्यांना आसरा देत नाही, असा दावा कायम पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर केला जातो. मात्र शरीफ यांच्या कबुलीने पाक उघडा पडला आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना सक्रीय असल्याचेही शरीफ यांनी एका मुलाखतीत मान्य केले आहे.
देशाचा गाडा हाकणे कठीण
पाकिस्तानी न्यायालयात मुंबई हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी अतिशय संथगतीने सुरू आहे. यावरही शरीफ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेव्हा देशात दोन किंवा तीन समांतर सरकारे चालवली जात असतात, तेव्हा देशाचा गाडा हाकणे कठीण असते. हे थांबायला हवे. देशात फक्त एकच सरकार असू शकते, जे संविधानाच्या चौकटीत चालवले जाते, असे म्हणत शरीफ यांनी पाकिस्तान सरकारमधील हस्तक्षेपावर भाष्य केले. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन 9 महिन्यांपूर्वी शरीफ पंतप्रधान पदावरुन पायउतार झाले आहेत. कोणत्या कारणामुळे तुमचे पंतप्रधानपद गेले, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.
सुनावणी का पूर्ण केली नाही?
शरीफ म्हणाले, आम्ही स्वत:ला वेगळे करुन घेतले होते. अनेकदा बलिदाने देऊनही कोणालाही आमचे म्हणणे पटत नव्हते. अफगाणिस्तानची व्यथा सगळ्यांनी ऐकली. ती सर्वांना पटली. मात्र आमचे म्हणणे कोणीही मान्य केले नाही. याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवे. देशात दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. त्यांना सीमा ओलांडायची आणि मुंबईत जाऊन 150 लोकांची हत्या करण्याची परवानगी द्यायला हवी का? रावळपिंडीच्या दहशतवादविरोधी न्यायालयात आम्ही मुंबई हल्ल्याची सुनावणी का पूर्ण केली नाही?, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.