नवीन कृषी कायद्याच्या शेतकऱ्यांना फायदाच: मोदींकडून पुनरुच्चार

0

नवी दिल्ली: गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन होत आहे. विरोधकांनीही यावरून मोदी सरकारला लक्ष केले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नवीन संधी निर्माण होणार असल्याचे पुनरुच्चार करत कृषी कायद्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते FICCI च्या ९३ व्या वार्षिक बैठकीचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी संबोधित करताना त्यांनी कृषी कायद्यांसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

कृषी कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांवर भाष्य करत त्यांनी या कायद्यांचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे म्हटले. कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी निगडीत अन्य क्षेत्रांमध्ये अनेक अडथळे पाहिले. आता यांच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती हटवल्या जात आहेत. सर्व समस्या दूर केल्या जात आहेत. या सुधारणांनंतर शेतकऱ्यांना नवे बाजार मिळतील, पर्याय उपलब्ध होती, तंत्रज्ञानाची मदत मिळेल. देशातील कोल्ड स्टोरेजच्या सुविधांमध्येही आधुनिकीकरण होईल. यामुळे सर्वाधिक गुंतवणूक ही कृषी क्षेत्रात होईल. याचा सर्वाधिक फायदा आपल्या शेतकऱ्यांनाच होणार असल्याचं मोदी म्हणाले.

“शेतीमध्ये जेवढी खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक झाली पाहिजे होती ती करण्यात आली नाही. खासगी क्षेत्रानं कृषी क्षेत्रावर हवं तसं काम केलं नाही. कृषी क्षेत्रात ज्या खासगी कंपन्या चांगलं काम करत आहेत त्यांना अधिक चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे,” असंही ते म्हणाले. भारतातील बाजारांचं आधुनिकीकरण होत आहे. देशात सर्वत्र सुधारणा करण्यात आल्या आहेत. आज भारतात कॉर्पोरेट टॅक्स हा जगात असलेल्या टॅक्सपेक्षा सर्वात कमी आहे. देश आज प्रगतीपथावर आहे. जेव्हा एक क्षेत्र विकसित होतं तेव्हा त्याचा इतर क्षेत्रांवरही सकारात्मक परिणाम होत असल्याचं मोदी म्हणाले.