नांदेड- सीआरपीएफच्या भरतीमध्ये पुण्यात वानवडी येथे झालेल्या परीक्षेत 30 उमेदवारांच्या उत्तरपत्रिका सोडवण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलीस भरती घोटाळ्यात पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. घोटाळ्याचा सूत्रधार ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर यांचा पुतण्या प्रवीण भटकर आणि त्याच्या साथीदाराने सीआरपीएफच्या उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये जमा केले, अशीही माहिती पोलीस तपासात उघड झाली. प्रवीण भटकरच्या एसएसजी या कंपनीकडे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम होते.
दरम्यान, पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. त्यामुळे आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस भरती गैरव्यवहार प्रकरणी तपासासाठी काल एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. अप्पर पोलीस अधीक्षक एसआयटीचे प्रमुख आहेत. तर पोलीस निरीक्षकांऐवजी आता पोलीस उपअधीक्षक तपास अधिकारी आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी अन्य चार पथकांचीही नियुक्ती करण्यात आली होती.
या प्रकरणी दोघा पोलिसांसह 20 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 पैकी 12 आरोपी नांदेड पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसात भरती करण्यासाठी उमेदवारांकडून साडेसात लाख रुपये उकळल्याचं समोर आले आहे. पोलिस भरती प्रक्रियेमध्ये उत्तर पत्रिकांच्या तपासणीचं कंत्राट एसएसजी कंपनीकडे होतं. या कंपनीच्या मदतीनेच भरती घोटाळा करण्यात आल्याचं उघड झालं आहे. नांदेडसह अन्य चार जिल्ह्यांतील पोलिस भरतीच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम होते.