‘राजकारणी लोकांवर विश्वास नाही’; भास्करराव पेरे पाटील यांचं विधान चर्चेत
सहा हजार आमदार झाले मात्र सहा गाव देखील चांगली नाहीत
पुणे : राजकारणी लोकांवर विश्वास नसल्याचं विधान भास्करराव पेरे पाटील यांनी केलं आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात सहा हजार आमदार झाले मात्र सहा गाव देखील चांगली झालेली नाहीत असा हल्लाबोल आदर्श सरपंच म्हणून ओळख असणाऱ्या भास्करराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात सध्या चांगलीच चर्चा आहे.
भास्करराव पेरे पाटील म्हणाले की, शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्याला शेती करण्याबरोबर शेतीमाल उठत नाही याची चिंता आहे. याचं कारण फक्त त्याला शिक्षण नाही. पण यातून आपण मार्ग काढला असता आपल्याला योग्य शिक्षण असत तर त्यामुळे माझा तर राजकारणांवर भरोसाच नाही आणि आपल्याकडची लईच लोकही राजकारण्यांच्या भरोशावर बसली आहेत.
आपल्या महाराष्ट्रात पाटोदा, हिरवे बाजार आणि राळेगणसिद्धी आणखीन एखादा दुसरं गाव ही हाताच्या बोटावर मोजण्यासारखी विकसीत आणि चांगली झाली. राज्याच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत महाराष्ट्रात सहा हजार आमदार झाले आहेत. मात्र सहा गाव देखील चांगली झालेली नाहीत आणि आम्ही बसलोय त्यांच्या भरोशावर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी दोन-चार गाव चांगली झाली आहेत. ती आमदारांची गावं नाहीत, असंही भास्करराव पेरे पाटील म्हणाले.